कल्याण- अहिल्यानगर रेल्वेमार्गास मंजुरी मिळावी: माळशेज रेल्वे कृती समितीची मागणी
1 min read
वडगाव कांदळी:- ऐतिहासिक वारसा लाभलेले विद्येचे माहेरघर पुणे व धार्मिक ऐतिहासिक परंपरांनी पावन क्षेत्र नाशिक या दोन्ही शहरांना जोडणारा पुणे-नाशिक रेल्वेमार्ग अर्थात पुणे, हडपसर, चाकण, अहिल्यानगर, राहुरी, शिर्डी आणि नाशिक असा प्रस्तावित आहे.वेळ आणि गती: गाड्या ताशी १६० ते २०० किमी वेगाने धावतील, ज्यामुळे २३५ किमीचे अंतर सुमारे २ तासांत पार करणे शक्य होईल हा रेल्वेमार्ग मंजूर केल्याबद्दल केंद्र सरकार,मा.रेल्वेमंत्री व मा.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
आता प्रास्तावित मुंबई लातूर एक्स्प्रेसवे जनकल्याण महामार्गाच्या समांतर कल्याण-मुरबाड-माळशेज(दाऱ्याघाट)शिवनेरी-वासुंदे मार्गे अहिल्यानगर रेल्वेमार्गाला मंजूरी देऊन ट्रँगल पूर्ण करावा.अहिल्यानगर-बीड-परळी रेल्वेमार्ग गतीमान व्हावा.ज्यामुळे हा रेल्वेमार्ग बीड-परळीसह मराठवाड्याच्या विकासाचा राजमार्ग ठरेल.हा रेल्वेमार्ग झाला तर देशाची पश्चिम-पूर्व किणारपट्टी मुंबई-विशाखापट्टनम जोडणारा देशातला सर्वात मोठा रेल्वे प्रकल्प साकारला जाईल. तसेच कोंकण,प.महाराष्ट्र, मराठवाड्याला नजिकच्या मार्गाने मुंबईशी जोडणारा हा रेल्वेमार्ग साकारेल.या रेल्वेमार्गामुळे देशाच्या वैभवात भर पडेल. बीड,परळी,अहिल्यानगर, जुन्नर ,मुरबाडच्या शेतकऱ्याला उत्पन्नाचे जोडमार्ग प्राप्त होतील.अकोले- संगमनेरच्या दक्षिण डोंगराळ भागाचा कायापालट होईल. माळशेज-शिवनेरी- लेण्याद्री,भिमाशंकर या परिसरात पर्यटन उद्योग वाढेल व त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल.शेतकऱ्याला जोडव्यावसायाच्या संधी प्राप्त होतील.पर्यटन उद्योगाला वाव मिळेल,साखर,भाजीपाला, फळे आदी कृषी उत्पादने मुंबई मार्गे देश विदेशात निर्यात करता येतील. त्यातून शेतकऱ्याच्या उत्पन्नात भर पडेल. विदेशी लक्ष्मी समृद्धीच्या मार्गांनी बळीराजाचे दार ठोठावेल. मुंबई-ठाणेची श्रीमंती, पुण्याची विद्वत्ता व अहिल्यानगरचा सहकार या त्रिवेणी संगमातून महाराष्ट्राचे भाग्य रेखाटले जाईल.
स्वातंत्रसेनानी स्व.गोविंदभाई श्रॉफ,स्व.खासदार केशरकाकू क्षीरसागर,पत्रकार सुधाकर डोईफोडे, स्व.आमदार श्रीकृष्णराव तांबे, स्व.निवृत्तीशेठ शेरकर,स्व.प्रकाश परांजपे,स्व.शांतारामबापू घोलप,स्व.प्रो.रामभाऊ कापसे,स्व.गोपीनाथ मुंढे,स्व.बाळासाहेब विखेपाटील,स्व.दिलीप गांधी,स्व. स्वॉलि.गुलाबराव शेळके अशा अनेक दिग्गज नेत्यांनी मागणी केलेल्या या रेल्वेप्रकल्पाच्या मंजूरीसाठी
सन १९९६ पासून माळशेज रेल्वे कृति समितीच्या माध्यमातून पाठपुरावा करित आहोत. हा रेल्वेमार्ग व्हावा म्हणून निर्धार मेळावे, रेल्वे परिषदा,जनजागरण यात्रा, रेल्वेरथयात्रा, ५ लाख सहयांची मोहिम,दिल्ली यात्रा असे सर्व सोपस्कार माळशेज रेल्वे कृति समितीने पार पाडले.त्यातून सन २००६ साली सर्वेक्षण झाले. तर सन २०१९ पासून मुरबाड पर्यंत पहिला टप्प्या मंजूर झाला. (हा पहिला टप्पा मढ-शिवनेरी पर्यत होणं हे व्यावहारिकदृष्ट्याही सोयीचे आहे.त्यातून मुरबाड, शिवनेरीपर्यंत ५ वी मुंबई विकसीत होईल.)
या रेल्वेमार्गासाठी मा.शरद पवारसाहेब व मा.अण्णा हजारे यांचे आशिर्वाद लाभले.खा.सुप्रियाताई सुळे,शिवाजीराव आढळराव पाटील,खा.भाऊसाहेब वाकचौरे,बाळासाहेब थोरात,शिवाजीराव नलावडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी माळशेज रेल्वे कृति समितीला कायम सक्रिय साथ दिली.महाराष्ट्राच्या सर्वांगिन हितासाठी कल्याण-अहिल्यानगर मंजूरीसाठी भविष्यात बीड,परळी पासून सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन तरुणांचे संघटीत करन संघर्ष उभारणार असा निर्धार माळशेज रेल्वे कृति समितीचे अध्यक्ष दिनेशचंद्र हुलवळे, उपाध्यक्ष मुरलीधर गुंजाळ,दादा भालेकर, मिलिंदराव गंधे,जि.प.सदस्य गुलाबशेठ पारखे, वैशवशेठ काळे,राजूभाऊ घुगे,सतिष बांगर यांनी व्यक्त केला आहे.या पत्रकार परिषदेला नारायणराव डख, युवराज लगड, विलास आरोटे, बाप्पा धुमाळ उपस्थित होते.