मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानातर्गत पालघर येथे जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन
1 min readपालघर :- ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांनी नागरिकांच्या मनामधील सुखाची संकल्पना साकार होण्यासाठी पायाभूत सोयी व इतर आवश्यक सुविधा पुरवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करायला हवा तसेच राज्य शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामध्ये राज्यात अव्वल यावे अशी अपेक्षा पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात आज आयोजित करण्यात आले होते. यावेळी खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे व इतर मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी जिल्ह्यातील अनेक सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते.

या योजनेबद्दल माहिती देताना मनोज रानड यांनी ग्रामपंचायतीने चांगले काम करण्यासाठी प्रेरित व्हावे यासाठी या योजनेचे महत्त्व पटवून सांगत या योजनेच्या अंमलबजावणीद्वारे गावामध्ये विकासाची गंगा वाहावी अशी अपेक्षा व्यक्त केली. शासनाच्या विविध योजनांचा व अभियानांचा सार या योजनेत समाविष्ट करण्यात आला असून ग्रामीण भागाचा विकास साधने व बळकटीकरण करणे हे त्यामधील प्रमुख उद्दिष्ट असल्याचे नमूद केले. १७ सप्टेंबर पासून या योजनेला प्रारंभ होणार असून ती ३१ डिसेंबर पर्यंत कार्यरत राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या योजनेत चांगली कामगिरी बजावणाऱ्या ग्रामपंचायतीचे गुणांकन जानेवारी २०२६ मध्ये केले जाणार असून विविध स्तरांवर भरघोस पुरस्कार असल्याची माहिती त्यांनी याप्रसंगी दिली.