रत्नागिरीत 60 वर्ष जुना पूल कोसळला, पण मोठा अनर्थ टळला.
1 min readरत्नागिरी : कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण तालुक्यात पूल दुर्घटना घडली आहे. तालुक्यातील खडपोली एमआयडीसीकडे जाणारा महत्वाचा पूल कोसळला आहे. शनिवारी रात्री उशिरा ही घटना घडली. 1965 च्या सुमारास हा ब्रीज बांधण्यात आला होता. हा पूल जीर्ण झाल्याने कोसळल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हा ब्रिज नवीन बांधण्यासाठी प्रस्ताव एमआयडीसीकडे देण्यात आल्याची माहिती चिपळूण तालुका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
खडपोली, गाणे आदी गावांकडे जाणारी वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे. मात्र पर्यायी मार्गावरून अवजड वाहने वाहतूक करू शकत नाहीत. हा पूल शनिवारी रात्री कोसळला आहे हा पूल कोसळल्याने पिंपळी-खडपोली-दसपटी या मार्गांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. हा ब्रीज कोसळला तेव्हा दैव बलवत्तर म्हणून या पुलावर कोणीही नव्हते त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
कोकणात गेले आठ दिवस मुसळधार पाऊस सुरू होता गुरुवारपासून पावसाचा जोर ओसरला आहे. मात्र शनिवारी दिवसभर हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू होता. याचा फटका सगळ्यात जुन्या असलेल्या खडपोली एमआयडीसी व काही गावांकडे जाणाऱ्या मोठ्या पुलाला बसला आहे. हा पूल जुना झाल्याने नवीन पुलाचा प्रस्ताव एमआयडीसीकडे यापूर्वीच पाठवण्यात आला आहे, अशी माहिती चिपळूण तालुका प्रशासनाच्या सूत्रांनी दिली आहे.